Pages

28 Jan 2011

२ वेगवेगळ्या डायरीज ... धोबीघाट आणि 127 Hours ...

काल एका दिवसात २ वेगवेगळ्या डायरीज बघायचा, अनुभवायचा योग आला. एक तर अमीरखान आणि किरण रावचा बहुचर्चित धोबीघाट - मुंबई डायरीज आणि दुसरा म्हणजे 127 Hours. धोबीघाट ९५ मिनिटांचा तर 127 Hours ९४ मिनिटांचा. एक डायरी मुंबईमधल्या ४ माणसांची तर दुसरी अमेरिकेतल्या कॅनियोन मधली ऍरॉन रालस्टनची.

धोबीघाट -
धोबीघाट ही अरुण (अमीर खान) - आरटिस्ट, मुन्ना (प्रतिक बब्बर) - धोबी आणि उंदीर मारणारा कामगार, शाय (मोनिका डोग्रा) - इन्वेस्टमेंट बँकर व फोटोग्राफर आणि यास्मिन (क्रिती मल्होत्रा) ह्या ४ व्यक्तिमत्वांची कथा आहे. ह्या चौघांची आयुष्य एकमेकांशी कशी गुंतलेली असतात हे ह्या लघुपटात सशक्तपणे(?) मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यामध्ये मुन्ना हे मुख्यपात्र असे कुठेही वाटत नाही. अरुणचे पात्र हे सर्वात मुख्य असून ते इतर तिघांशी ह्या ना त्या कारणाने जोडलेले आहे. मुन्ना आणि शाय यांचा संबंध देखील अरुण बरोबर येतो. पण यास्मिनचा संबंध फक्त अरुण बरोबर येतो आणि तो ही थेट नाही. अमीर खानने आरटिस्ट म्हणून अरुण व्यवस्थित रंगवलेला आहे. पण संपूर्ण चित्रपटात त्याच्या थोड्या विचित्र वागण्याचे कारण नीटसे समजून येत नाही. दर काही महिन्यांनी घर बदलत राहणारा अरुण मुन्नाला मात्र त्याच्या प्रत्येक नव्या घराचा पत्ता द्यायला विसरत नसतो. कारण मुन्ना असतो धोबी. धोबीघाटावर कपडे धुवून ते तो अरुणला आणून देत असतो. प्रतिक बब्बरकडून अभिनया बाबतीत अनेक अपेक्षा होत्या. किमान माझ्यातरी होत्या. मात्र त्याचा अभिनय सशक्त वाटत नाही. तसा तो त्याच्याकडून करवून घेतला आहे की काय अशीही शंका येते. संपूर्ण चित्रपटात २-३ मोजके क्षण सोडले तर धोबीघाटाचा नामोनिशाण नाही. चित्रपटाला धोबीघाट ऐवजी थेट मुंबई डायरीज असे इंग्रजी नावच नाव योग्य ठरले असते. ह्याचे अजून एक कारण म्हणजे चित्रपटात असलेले इंग्रजी संवाद. घेतलेल्या तिकिटावर पार्शियली इंग्लिश असे लिहिलेले असताना हा चित्रपट पार्शियली हिंदी आहे की काय असा प्रश्न पडावा. अरुण आणि शाय ह्यांचे सर्व संवाद इंग्रजीमध्ये आहेत. शाय अमेरिकेत राहते आणि ब्रेक म्हणून ती मुंबईला आली आहे. तिला मुंबईची काही भाग बघून त्याचे फोटो काढायचे आहेत. तिचे हिंदी व्यवस्थित आहे. मुन्नाबरोबर तो हिंदीमध्ये बोलते मात्र अरुण बरोबर पूर्ण इंग्रजीमध्ये. असे का? यास्मिनची कहाणी फक्त टी.व्ही. मधून अरुणला दिसत राहते आणि त्यावर अरुणची मनस्थिती बदलत जाते.




अवघ्या ९५ मिनिटांमध्ये कथा बांधायचा हा प्रयत्न तितका प्रभावी ठरत नाही. कथा सुरवातीला बरीच आणि मध्ये थोडीफार त्रोटक वाटते. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे काही क्षण त्यांना एका धाग्यात बांधायचा प्रयत्न करतात पण तोपर्यंत चित्रपट आपल्याला भावलेला नसतो. ते क्षण कोणते हे प्रत्येकाने बघणेच योग्य ठरेल. चित्रपटात काही दृश्ये मुंबईचे जीवन मान दर्शवतात. मुन्नाने चालत्या रेल्वे शेजारी अंघोळ करणे, जुन्या वस्त्यांमधून फिरणे हे मुंबईमध्ये राहिलेल्या आणि मुंबई पाहिलेल्या लोकांसाठी काही नवीन नाही. चित्रपट फक्त प्रौढासाठी आहे ह्याचे कारण त्यात वापरलेल्या काही इंग्रजी शिव्या. एक नवीन प्रयोग म्हणून जरी धोबीघाटकडे पहिले तरी धोबीघाट किमान एकदा बघण्या लायकीचा(?) आहे की नाही हे प्रत्येकाने बघूनच ठरवावे लागेल...


127 Hours -

127 Hours ही कथा आहे ऍरॉन रालस्टन याच्या आयुष्यावर. जेम्स फ्रांको याने ऍरॉन रालस्टन याची भूमिका १०० टक्के तंतोतंत उभी केली आहे असेच चित्रपट पाहिल्यावर म्हणावे लागते. ऍरॉन रालस्टनचे व्यक्तिमत्व जेम्स फ्रांकोच्या रूपाने आपल्यासमोर अवघ्या ९४ मिनिटांमध्ये उभे राहते. नव्हे ते भिडते आणि आपल्याला आतून अस्वस्थ करत जाते. विकेंडला पार्टीज पेक्षा डोंगरात रमणारा ऍरॉन अर्ध्या अधिक वेळा उटाह मधील कॅनियोन मध्ये पडीक असतो. तिथला बराच भाग त्याचा आवडीचा. 'ब्लू जॉन कॅनियोन' हा त्याच्या विशेष आवडीचा. तिथे चिमणी क्लाइम्ब (प्रस्तरारोहणाचा एक प्रकार) करत खालच्या निळ्याशार पाण्यात उड्या घेणे हा त्याचा आवडता उद्योग. अश्याच एका विकेंडला तो एकटाच रात्री सामान भरून निघतो आणि कॅनियोनमध्ये जातो आणि मग घडते एक थरारनाटय. हे त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरते.


तो निघताना आईचा फोन घेत नाही, सामान भरताना नेमके स्विस नाईफ विसरतो आणि चायना मेड मल्टी टूल मात्र घेऊन जातो, कुठे जातोय ते मित्राला सांगत नाही. इथेच त्याने डोंगरातला पहिला नियम मोडलेला असतो. आपण एकटे जाताना नेमके कुठे जातोय हे कोणा ना कोणाला तरी सांगणे किती आवश्यक असते ते चित्रपटाचा शेवटी समजते. शनिवारी बाईकिंग करत तो पुढे हायकिंग करत निघतो आणि वाटेत मेगन व क्रिस्टी या २ मुलींना भेटतो. त्यांना तो त्याची आवडती ब्लू जॉन कॅनियोन मधील जंप दाखवतो. हा सीन जबरा आहे. एकदम जबरदस्त... पुढे त्या दोघींना टाटा करत कॅनोयोन मधून पुढे जाताना एका लूस बोल्डरवर त्याचा अपघात होतो आणि तो बोल्डर (दगड) त्याच्या उजव्या हातावर पडून त्याचा हात अतिशय वाईटरित्या अडकतो. पुढे त्याचे काय होते ते बघणेच योग्य ठरेल. ५ दिवस (१२७ तास) तश्या अवस्थेत तो काय करतो, सुटण्यासाठी तो काय काय धडपड करत राहतो, त्याला काय काय भास-आभास होतात हे अत्यंत सक्षमरित्या चित्रपटात मांडलेले आहे. मानवी मन संकटात कसे खेळ खेळते नाही!!! ते चित्रपटात बघणेच योग्य ठरेल. सर्वच इथे सांगितले तर बघण्याची उत्सुकता निघून जाईल.

५ दिवस स्वतः:ला Dont Give Up... Dont Loose your Mind ...  सांगणारा ऍरॉन, अन्न नाही, पाणी संपत आलेले तरी सुद्धा जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला ऍरॉन, एक अत्यंत धाडसी निर्णय घेतो. तो म्हणजे स्वतःचा हात शरीरापासून कापून टाकण्याचा. हे मुख्य कथानक इथे लिहिले तरी ते बघताना तितकेच हृदयद्रावक असते. दगडाखाली अडकलेल्या उजव्या हाताचे हाड तो आधी स्वतः मोडतो. ए.आर.रेहमानने जबरदस्त साऊंड इफेक्ट्स इथे दिलेले आहेत. नंतर सोबत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या चायना मेड मल्टी टूलने तो सर्व रक्तवाहिन्या आणि मसल्स कापून काढतो. अखेर १२७ तासांनी त्याची तिथून सुटका झालेली असते. मृत्यूवर त्याने विजय प्राप्त केलेला असतो.


 ऍरॉन रालस्टन...

चित्रपटाच्या शेवटी लिहिलेल्या २ ओळी चित्रपटाचे सार सांगून जातात. एक म्हणजे ऍरॉन एका पक्क्या भटक्या प्रमाणे आजही जगभरात माउंटेनेरिंग आणि क्लाइम्बिंग करतो. अगदी कॅनियोन मध्ये सुद्धा. आणि दुसरे म्हणजे तो कुठे जातोय याची माहिती तो घरी सोडून जातो. डोंगरातले नियम मोडण्याची चूक तो पुन्हा आयुष्यात करेल असे वाटत नाही. ऍरॉनने केलेल्या धाडसाला, त्याच्या इच्छाशक्तीला खरोखर सलाम... आता ह्या प्रसंगावर त्याने स्वतः लिहिलेले पुस्तक वाचायचे आहे. त्याच्या ह्या धाडसाबद्दल अजून वाचायचे आहे...




काल पाहिलेल्या २ डायरीज... भिन्न तरीही परिणाम साधलेल्या... नकळत तुलना होतेच. 127 Hours धोबीघाटला खूप मागे टाकून पुढे निघून गेला. कदाचित माझ्या डोंगरप्रेमाचा तो परिणाम असावा...


सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार...  

19 Jan 2011

सर.. तुमची दिल्ली दाखवा ...

हा ब्लॉग सुरू करायचे अनेक महिने मनात असले तरी आत्ताच हा ब्लॉग सुरू करायचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी आकाने (आनंद काळे) सुरू केलेला एक बझ. सर्वांचे लहानपणीचे किस्से ऐकून अनेक दिवसांनी मनमोकळेपणाने पोट दुखेपर्यंत हसलो. तेंव्हाच ठरवले एक ब्लॉग सुरू करायचाच. त्यावर मी माझ्या शालेय जीवनातला एक छोटासा किस्सा टाकला होता तो इथे पुन्हा सविस्तरपणे मांडतोय.



साल १९९८... माझे दहावीचे वर्ष.. पहिल्या की दुसऱ्या चाचणी परीक्षेचे पेपर तपासून हातात पडलेले. त्यातला भूगोलाचा पेपर मी अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने पुन्हा पुन्हा तपासून बघत होतो. भूगोल माझा तसा आवडीचा विषय. लक्ष्यात आले की भूगोलाच्या शिक्षकांनी माझ्या एका बरोबर उत्तराला चूक देऊन गुण दिले नव्हते. भारताच्या नकाशामध्ये 'दिल्ली'चे भौगोलिक स्थान दाखवा असा तो प्रश्न होता. येत्या भूगोलाच्या तासाला शिक्षकांना ह्याबद्दल विचारायचे असे मी ठरवले होते. शिक्षक आल्यावर ज्यांचे गुण मोजण्यात किंवा देण्यात चूक झाली होती अशी २-३ मुले-मुली पुढे गेल्या. मी त्यात सर्वात शेवटी होतो. सर्वांचे समाधान झाल्यावर शिक्षकांनी मला विचारले,'चौधरी. काय झाले?'

मी : सर. मला एका प्रश्नाचे मार्क दिलेले नाहीत. हा बघा.
सर : कुठला रे.. बघू. हा? अरे चूक आहे ते.
मी : सर ते चूक कसे? दिल्ली तर इथेच आहे ना.
सर : नाही रे. दिल्ली बघ इथे आहे.. (सरांनी हरियाणामध्ये कुठेतरी बोट ठेवत सांगितले.)
मी : सर. दिल्लीतर हरियाणा आणि उत्तरप्रदेशच्याबरोबर मध्ये आहे. भूगोलाच्या पुस्तकात तसेच दाखवले आहे.
सर : कुठले पुस्तक वापरतोस तू? माझ्या पुस्तकात दिल्ली ही बघ इथे आहे. (सरांनी हरियाणामध्ये पुन्हा तिथे बोट ठेवत सांगितले)


(मला विनाकारण सरांशी वाद घालायचा नव्हती पण... शेवटी तत्वनिष्ठ माणूस मी... :D सरांना बोललोच...)
मी : सर.. तुमची दिल्ली दाखवा..

आता मात्र सर उडाले. वर्गात सर्वत्र हशा. काही मुले-मुली आपापसात कुजबुजू लागले.


सर : तुझ्या अश्या वर्तनाबद्दल मी तुला मुख्याध्यापकांकडे घेऊन जाऊ शकतो.
मी : हरकत नाही सर. पण बरोबर आहे त्याचे गुण मला मिळायलाच हवेत.
(हवंतर तिकडे जाऊन दिल्ली दाखवा - हे मनात)

पुढे काय... मला माझे गुण मिळाले.. तब्बल २ गुण... माझ्यासारख्या इतिहास आणि भूगोलात आवड असलेल्या विद्यार्थ्याने दिल्ली चुकावी??? ... असाच अजून एक दीड गुणाचा किस्सा अजून एका शिक्षकाबरोबर त्याच वर्षी झाला. तो पुन्हा कधीतरी..

आत्ता मात्र काम आटोपून उडायची तयारी करतोय... :) सुट्टीवर घरी पळतोय. लवकरच भेटू एखादा मजेशीर किस्सा घेऊन.. :)

15 Jan 2011

मी घडलो... बिघडलो...

बऱ्याचदा निवांत बसलेलो असताना अचानक कुठूनशी एखादी आठवण येते आणि मन सैरभैर करून जाते. हो नं.. आठवणी आल्या की त्या काय सहजासहजी थोडीच थांबतात. एकामागून एक अश्या येतच जातात आणि मग निर्माण करून ठेवतात मनावर एक ठसा. पुन्हा एक नवीन आठवण. आयुष्यात प्रत्येक क्षणी आपल्यासमोर आलेल्या प्रसंगांच्या आठवणींची एक-एक पानं आपण जपून ठेवतो आणि मग ते एक-एक पान हळुवारपणे आपण उलगडू लागतो. लहानपणापासून आपण जिथे वाढलो, लहानाचे मोठे झालो, आपले आई-वडील, आपले पहिले राहते घर, आपली शाळा, लहानपणीचे मित्र - मैत्रिणी, प्रेम, आयुष्यात आलेला तो प्रत्येक क्षण आपण भरभरून जगलेलो आहोत हे आता आपण मोठे झाल्यावर हळूहळू लक्ष्यात येते. मग आपण आठवणी जागवू लागलो. लहानपणी भरभर मोठे व्हायचे असते आणि मोठे झालो की 'लहानपण देगा देवा' म्हणत आपण दिवस काढतो...

अश्याच काही आठवणी मी आता ह्या ब्लॉगद्वारे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. ह्यात सर्व काही असेल... माझे लहानपणीचे धमाल किस्से असतील. कैच्याकै लिखाण असेल, आवरा लिखाण पण असेल, धमाल - मज्जा - मस्ती असे सर्व-सर्व असेल. सोबत माझी विविध विषयांवरील मते असतील जी मी आत्तापर्यंत मांडायचे टाळत आलोय. शुभेच्छा असतील, खादाडी असेल आणि विचारमंथन पण असेल.. माझ्या आयुष्यावर प्रभाव सोडून गेलेल्या, भावलेल्या व्यक्तींचे चित्रण असेल, एखादी कथा किंवा ललित आलेच तरी दचकू नका हा.. :)


ह्या सर्व अनुभवांमधून मी थोडा घडलोय... आणि थोडा बिघडलोय... शेवटी आयुष्य म्हणजे काय.. 'परिपूर्णतेकडे चालू अस
लेली एक वाटचाल'. हा ब्लॉग सुद्धा त्याचाच एक भाग असे समजून पुढे सरकतोय... मला खात्री आहे आजवर माझ्या इतिहास आणि भटकंती लिखाणाला जसा प्रतिसाद आपण दिलात तसाच प्रतिसाद आत्ता सुद्धा द्याल.


तुम्हा सर्वांवर लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा... 
 

शुभेच्छापत्र आलेल्या विरोपातून साभार..